Red Chilli Price । नंदुरबार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती ही मिरची खरेदी विक्रीसाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती असून दररोज तीन ते चार हजार क्विंटल मिरची तीनशे ते चारशे वाहनांतून विक्रीसाठी येते. मिरची मोठ्या प्रमाणात येत आहे. मात्र यंदा मिरचीची आवक वाढली असली तरी मिरचीचे दर जैसे थेच आहेत. प्रतवारीनुसार लाल मिरचीचा भाव प्रतिक्विंटल 3000 ते 6500 रुपये आहे. मिरचीचे दर स्थिर राहिल्याने शेतकरी समाधानी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर दुपटीने वाढले आहेत. गतवर्षी मिरचीचा भाव 2500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होता.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी आतापर्यंत ९० हजार क्विंटल मिरचीची खरेदी केली आहे. सध्या त्याचा हंगाम पुढील पाच महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे यंदा नंदुरबार बाजार समितीत मिरची खरेदी-विक्रीचा विक्रमी व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेशातूनही नंदुरबारमध्ये मिरची विक्रीसाठी येत आहे.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार
बाजार समितीत 25 ते 26 व्यापारी या मिरचीची खरेदी करून योग्य भाव देत आहेत. जिल्ह्यात यंदा मिरचीचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी व्यक्त केली आहे. यंदा अनुकूल वातावरण आणि मिरचीला चांगला भाव या दोन्ही बाबी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरल्या आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यात यंदा मिरचीच्या उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज आहे.